I made this widget at MyFlashFetish.com.

Thursday, February 5, 2009

आदी शंकराचार्य


सात वर्षाचा एक संन्यासी मुलगा गुरुआज्ञेनुसार भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या ब्राह्मणाच्या घरात धान्याचा दाणासुद्धा नव्हता. ब्राह्मणाच्या पत्नीने मुलाच्या हातावर आवळा ठेवला आणि आपण काहीच भिक्षा देऊ शकत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. ब्राह्मणाची हलाखीची स्थिती पाहून कळवळलेल्या त्या मुलाने तिथल्या तिथे लक्ष्मीचे स्तोत्र रचून तिला त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करण्याची विनंती केली. लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने त्या निर्धन ब्राह्मणाच्या घरी सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला. जगतजननी लक्ष्मीला प्रसन्न करून त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करणारा तो संन्यासी मुलगा पुढे जाऊन आदि शंकराचार्य या नावाने विख्यात झाला. शंकराचार्यांच्या रूपाने खुद्द भगवान शंकर जन्माला आले आहेत, असे मानले जाते. केरळमधील कालाडी गावात रहाणार्‍या शंकराचार्याच्या वडिलांना-शिवगुरू नामपुद्री - यांना लग्नानंतर बरीच वर्षे झाली तरी मूल होत नव्हते. त्यावेळी नाममुद्री यांची पत्नी विशिष्टादेवी यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा धरून शंकराची आराधना करायला सुरवात केली. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विशिष्टादेवींनी स्वप्नात दर्शन दिले. विशिष्टादेवींनी त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी असा वर मागितला. त्यावर शंकर म्हणाले, ''हे बघ मी तुला पुत्र देतो. पण विद्वान पुत्र मागितलास तर तो जास्त काळ जगणार नाही आणि विद्वान नसलेला पुत्र दीर्घकाळ जगेल. बोल तुला कोणता पुत्र हवा?'' त्यावर विशिष्टादेवींनी विद्वान पुत्राची मागणी केली. शंकर तथास्तु म्हणाले आणि या पुत्राच्या रूपाने आपणच तुझ्या पोटी जन्म घेणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर काही काळाने इसवी सन ६८६ मध्ये वैशाख शुक्ल पंचमीला (काहींच्या मते अक्षय्यतृतीयेला) मध्यानकाली विशिष्टादेवींनी तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याच्या शरीरावर जन्मतः असलेल्या खुणा पाहून हा शंकराचा अवतार असल्याची सगळ्यांचीच खात्री पटली. म्हणून त्याचे नाव शंकर ठेवण्यात आले.''हे बघ मी तुला पुत्र देतो. पण विद्वान पुत्र मागितलास तर तो जास्त काळ जगणार नाही आणि विद्वान नसलेला पुत्र दीर्घकाळ जगेल. बोल तुला कोणता पुत्र हवा?''शंकराचार्यांचा जन्म झाला तो काळ मोठा कठीण होता. भारतात वैदिक धर्माला ग्लानी आली होती. शंकराचार्यांच्या रूपाने एक तेजस्वी शलाका या अंधकारमय जगाला भेदत आली आणि तिने आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने जगाला उजळून टाकले. वयाच्या तिसर्‍या वर्षापर्यंत छोटा शंकर मल्ल्याळम शिकला होता. त्याने संस्कृत शिकावे अशी पित्याची इच्छा होती. पण पित्याचा अकाली मृत्यू झाल्याने संसाराची सारी जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. या माउलीने छोट्या शंकराला काहीही कमी पडू दिले नाही. पाच वर्षापर्यंत त्याची मुंज करून त्याला गुरूगृही धाडले. तिथे गेल्यावर छोट्या शंकराच्या अफाट प्रतिभेने गुरूही चकित झाले. अवघ्या दोन वर्षात या मुलाने वेद, पुराण, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी ग्रंथ कंठस्थ करून सगळ्यांना विस्मयचकित करून टाकले. गुरुंची सेवा करून घरी परतल्यानंतर ते मातेची सेवा करू लागले. त्याची मातृभक्ती मोठी विलक्षण होती. या माउलीला कालाडीपासून दूर असलेल्या आलवाई (पूर्णा) नदीत स्नान करण्याची इच्छा होती. शंकरने या नदीची प्रार्थना करून तिचा प्रवाह आपल्या गावाजवळ आणला आणि मातेची इच्छा पूर्ण केली. काही दिवसांनंतर शंकरचा विवाह करण्याचे त्याच्या आईच्या मनात घाटू लागले. पण त्यांना हे सगळे नको होते. त्याचवेळी एका ज्योतिषाने शंकरची पत्रिका पाहून हा मुलगा अल्पायुषी असेल असे सांगितले. त्यावर मग संन्यास घेण्याची शंकराची इच्छा आणखी प्रबळ झाली. संन्यास घेण्यासाठी त्याने आईजवळ हट्ट धरला अखेर मातेलाही त्याच्या या हट्टापुढे मान तुकवावी लागली. वयाच्या सातव्या वर्षी संन्यास घेऊन हे बालक देशभ्रमणासाठी निघाले. भ्रमण करताना ते नर्मदेच्या किनारी ओंकारनाथला आले. तेथे एक गुरू गोविंदपाद हे महायोगी अनेक वर्षांपासून तपश्चर्या करत असल्याचे शंकरार्यांच्या कानावर आले. त्यांच्याकडून शंकराचार्यांनी अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त केले. त्यानंतर गुरू आज्ञेने ते काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. वाटेत एका चांडाळाने त्यांची वाट रोखून धरली. त्या चांडाळाने त्यांना सांगितले, की तुमच्या शरीरात असलेल्या परमात्म्याची तुम्ही उपेक्षा करत आहात. त्यामुळे तुम्ही अब्राह्मण ठरता. त्यामुळे तुम्ही माझ्या मार्गातून दूर व्हा.'' चांडाळाच्या मुखातून देववाणी ऐकल्यानंतर, तुम्ही मला ज्ञान दिले म्हणजे आता तुम्ही माझे गुरू झाले आहात, असे सांगून शंकराचार्यांनी त्याला नमस्कार केला. त्यावेळी त्यांना चांडाळाच्या जागी त्यांना शिवाचे व चार देवांचे दर्शन झाले. काशीत राहिल्यानंतर शंकराचार्य महिष्मती नगरातील आचार्य मंडनमिश्र यांना भेटायला गेले. आचार्यांच्या घरात असलेली मैनासु्द्धा वेदमंत्र म्हणायची अशी ख्याती होती. शंकराचार्यांनी मंडनमिश्रांशी झालेल्या वादात त्यांचा पराभव केला. मंडनमिश्राचा पराभव होत असल्याचे पाहून त्यांची पत्नी शारदादेवी शंकराचार्यांना म्हणाली, की आपण माझ्या अर्ध्या अंगाचा पराभव केला आहे. माझा पराभव करून दाखवा तर तुम्ही खरे विजेते ठराल.शंकराचार्य संन्यासी होते, हे हेरून शारदादेवींनी त्यांना कामशास्त्रावर आधारीत प्रश्न विचारले. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची अडचण झाली. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी काही अवधी मागितला. त्यानंतर मग परकाया प्रवेश करून त्यांनी यासंदर्भातील सगळी माहिती जाणून घेतली. त्यानंतर मग त्यांनी शारदादेवींनाही वादात हरवले. काशीत असताना त्यांना बड्या विद्वानांना वादात हरविले. गुरूगृही आल्यानंतर अनेकांनी मग त्यांच्या हातून दीक्षा घेतली. यानंतर शंकराचार्यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार हेच व्रत हाती घेतले. अनेक ग्रंथ रचले. अद्वैत ब्रह्मवादी शंकराचार्य निर्विशेष ब्रह्मालाच सत्य मानत होते. ब्रह्मज्ञानात ते कायम निमग्न असत. एकदा ब्राह्ममुहूर्तावर ते स्नानासाठी मणिकर्णिका घाटावर जात होते. पण ते जात असलेली गल्ली अतिशय छोटी होती. त्या गल्लीतच एक स्त्री पतीच्या शवाचे डोके मांडीवर घेऊन विलाप करत होती. त्यावेळी आचार्यांच्या शिष्यांनी तिला बाजूला होण्याची विनंती केली. पण ती बाजूला झाली नाही. मग शंकराचार्यांनी स्वतःच तिला विनंती केली. त्यावेळी ती स्त्री म्हणाली, की 'आपण मला वारंवार हे शव बाजूला घेण्याची विनंती करत आहात. मग तुम्हीच या प्रेताला बाजूला व्हायला का सांगत नाही.' त्यावेळी हे प्रेत आहे. जिवंत माणूस नाही. हे शंकराचार्यांनी तिच्या लक्षात आणून दिले. पण मग त्या स्त्रीने त्यांना अडचणीत टाकणारा सवाल केला. 'हे महात्मा, शक्तीनिरपेक्ष सत्य हेच जगाचे कर्ता धर्ता आहे. मग शक्ती न लावताही हे शव का हटवले जाऊ शकत नाही'. या सवालावर आचार्यांना ही बाई साधीसुधी नाही हे लक्षात आले. समाधी लावल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की ही बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आदिमाया आहे. मग त्यांच्या तोंडातून आपोआप मातृवंदनेचे स्तोत्र बाहेर पडू लागले. आता शंकराचार्यांचे स्थान खूपच मोठे झाले होते. त्यांच्या ज्ञानाचा सागर रूंदावत गेला. त्यात अद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, निर्गुण ब्रह्मज्ञानाबरोबरच सगुण साकार रूपाची आराधनाही एकाचवेळी होती. ज्ञानाच्या अद्वैत भूमीवर निर्गुण निराकार ब्रह्म आहे. तेच ब्रह्म द्वैताच्या भूमीवर मात्र सगुण साकार रूपात आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी निर्गुण व सगुण दोन्हीचे समर्थन करून निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी सगुणाच्या शिडीचा वापर करणे अपरिहार्य असल्याचे मत मांडले. ज्ञान व भक्तीच्या मीलनाच्या भूमीवर अद्वैत ज्ञान हेच शेवटी लक्ष्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी 'ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या' असे सांगितले. शिव, पार्वती, गणेश, विष्णू यांची भक्तिरसात ओथंबलेली स्तोत्रे रचली. सौंदर्य लहरी, विवेक चूडामणी असे महान ग्रंथ रचले. शिवाय प्रस्तान त्रयीवर भाष्यही लिहिले. शैव-वैष्णवांमधील भांडणाची समाप्ती त्यांनी घडवून आणली. पंचदेवोपासनेची प्रथा पाडली. संपूर्ण भारताचा प्रवास करून देशाच्या चार दिशांना चार आश्रमांची स्थापना केली. संपूर्ण देशाला एका सांस्कृतिक, धार्मिक, दार्शनिक, आध्यात्मिक व भौगोलिक एकतेच्या सूत्रात बांधले. आयुष्याचे प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी नश्वर देह सोडून ते परमात्म्यात लीन झाले.

2 comments:

Anonymous said...

अजय गुरुजी वा ,
काय सुरेख सजवला ब्लॉग !! भरगच्च माहिती
त्यामुळे खरोखरच चांगले वाटले .
अभिनंदन , असेच लिहित राहा .
ज्योतिष्य विषयक लिखाण केल्यास आनंद होईल .

आपले

संजय बरबडे यवतमाळ

Anonymous said...

very good