I made this widget at MyFlashFetish.com.

Tuesday, July 24, 2012

कहाणी मंगळागौरीची :-

एक नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगि‍तली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. 

अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही. असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उ:शाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल, असं बोलून बोवा चालता झाला. 

तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची मूर्ती आहे. त्याने मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली, घरदारं आहेत, गुरंढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे. तुला पुत्र देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे! त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं सांगितलं. माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मांगे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल. देवी अदृश्य झाली.

वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, घरी नेण्याकरीता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो मोटेत आंबा एकच आहे. असं चारपाच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. 

काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं, तिथं काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकीचं भांडण लागलं, एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहे, काय द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही. मग मी तर तिची मुलगी आहे! हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं. हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचाईत पडली.


पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं, गोरज लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजविलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अगं अगं मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्‍यात ‍िशरेल. अंगच्या चोळीन तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला, भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिर्‍हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.

दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी यांजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची आंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. 

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आर्शीवाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं, यमदूत पळून गेले, गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा! तो म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितलं. यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नवर्‍यानं आंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला.

भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा! सासरमाहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र जाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं, मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

मंगळागौरः महिलांचा आनंदोत्सव :-

श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.

असे करतात मंगळागौरीचे व्रत 
आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते. 


ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते. 

पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. 



जागरणाची धमाल 
फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.



मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी केले जाते. उद्यापनाच्या वेळी यज्ञ केला जातो. आई वडिलांना वाण दिले जाते. मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे. त आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू किंवा वड्या घालून देण्याची पद्धत आहे. यामागे मंगळागौरीची पारंपरिक कथा आहे. या कहाणीतला नवरदेव अल्पायुषी असतो. त्याला दंश करण्यास साप येतो. पण त्या नववधूच्या मातेने मंगळागौरीचे व्रत केल्याने हा नवरदेव वाचतो. त्यावेळी त्या सापाचे रूपांतर हारात होते. म्हणून याच्या उद्यापनाला आईला वाण म्हणून यामध्ये एकसर (काळेमणी आणि सोन्याचा मणी) जोडवी, कूंकू, कंगवा आरसा असे दिले जाते. 

मंगळागौरीच काही गाणी 
1. पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा- 
पोरगा गं तुझी पोरगी गं माझी, 
पोरगा गं तुझा चकणा 
पोरगी गं माझी देखणी

2. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो. 
झिम पोरी झिम कपाळाचा भीम 
भीम गेला फुटून पोरी आल्या उठून 
सरसर गोविंदा येतो. मजवरी गुलाल फेकीतो
या या झिम्मा खेळाया 
आमच्या वेण्या घालाया. 
एक वेणी मोकळी 
सोनाराची साखळी. 
घडव घढव रे सोनारा. 
माणिकमोत्यांचा लोणारा. 
लोणाराशी काढ त्या 
आम्ही बहिणी लाडक्या. 

3. एक लिंबू झेलू बाई

4. चला चला गं चला सया
चला गं चलाफेर धरू चला
मंगळागौरीचे खेळ खेळू चला 
गोल करू चला फेर धरू चला
मंगळागौरीला जागवूया चला

आगोटा पागोटा चौपाटीवर जाईन म्हणते, भेळपूरी खाईन म्हणते.....

5. सूनबाई सुनबाई काय म्हणता सासूबाई माझ्या पाटल्या काय केल्या....



श्री मंगळागौरीची आरती :-
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।। 
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।। 
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।

Monday, June 4, 2012

कथा वटसावित्रीची :-

भद्र देशाचा राजा अश्वपी. त्याची एकुलती एक कन्या सावित्री. ती रूपसंपन्न व सद्‍गुणी मुलगी होती. ती उपवर झाली तेव्हा राजाने तिला, 'तू इच्छेप्रमाणे पतीची निवड कर' - असे सांगितले तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्राला वरले. सत्यावानाचा पिता द्युमत्सेन हा आंधळा व राज्यभ्रष्ट होता. म्हणून आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे.

सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुषी आहे हे देवर्षी नारदांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी व अश्वपती राजाने सावित्रीला दुसर्‍या वराची निवड करण्यास सांगितले, परंतु 'ज्याला मी मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसर्‍या पुरूषाचा मी विचारही करणार नाही,' असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगिलते व सत्यवानाशीच विवाह केला.

काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. कारण नारद मुनींच्या सांगण्यावरून सत्यवानाच्या मृत्यूचा हा दिवस आहे ते दिला ठाऊक होते.


लाकडे फोडून झाल्यावर ‍अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली. म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी स्वत: यम तेथे आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला.

तशी सावित्रीही त्याच्यामागून निघाली. यमाने तिची समजूत घालून, तिला परत जाण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य यासंबंधी सुसंवाद व विद्वत्तापूर्ण विवेचन केले.

तिच्या वाक्चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देऊ केले, तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने श्वशुराला दृष्टी, दुसर्‍या वराने त्याला राज्यप्राप्ती, तिसर्‍या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने पतीचे-सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशा प्रकारे पतिव्रत्याच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वत:च्या दिव्य, अलौकिक गुणांमुळे ती जगात अजरामर झाली.

Thursday, March 22, 2012

शालिवाहन शक म्हणजे काय?



हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मात्र, आपल्याला फारशी माहिती नसते.



शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.



याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले.



नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.



शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.






शक संवत- शंक संवताचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.



विक्रम संवत- भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याच्या शास्त्रीय विधी या आहेत ज्या शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाची स्मृतीत आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याची संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते.
गुढीपाडवा, गुढी, पाडवा, नववर्ष, शालिवाहन शक

Monday, April 18, 2011

श्रीमारुतिस्तोत्र:-



भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुतिवनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥

महाबळी प्राणदाता, सकंळा उठवी बळें ।सोख्यकारी दःखहारी, दुत वैश्ण्वगायका ॥

दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा ।पातालदेवताहंता, भव्यसिंदुरलेपन ॥

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा, पुरातना ।पुण्यवंता,पुण्यशीला, पावना परितोशका ॥

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोट्ला पुढे ।काळाग्नी , काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥

ब्रम्हांडे माइली नेणों, आंवळें दंतपंगती ।नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भुरकुटी,ताठिल्या- बळें ॥

पुछ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंड्लें बरीं ।सुवर्णकटिकासोटी,घंटा किंकिणि नागरा ॥

ठकारे पर्वताऐसा, नेट्का सडपातळू ।चपळांग पाहतां मोठे, महाविध्युल्लतेपरी ॥

कोटिच्या कोटि उड्डाणें, ज़्हेपावें उत्तरेकडे ॥मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधें उत्पाटिला बळे ॥

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगतीं ।मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥

अणुपासोनी ब्र्म्हांडायेवढा होत जातसे ।तयासी तुळणा कोठें, मेरुमांदार धाकुटे ॥

ब्र्म्हांडाभोंवतें वेढे, वज्रपुछए करुं शके ।तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडीं पाहतां नसे ॥

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सुर्यमंड्ळा।वाढ्ता वाढता वाढे, भेदिलें शुन्यमंडळा ॥

धनधान्य्पशुवृध्दि, पुत्रपौत्र समग्रही ।पावती परुपविद्यादि, स्तोत्रपाठें करुऐयां ॥

भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तहि ।नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ।

हे ध्ररा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ॥दृढदेहो निसंदेहो सैख्या च्न्द्रकळागुणें ॥

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू ।रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोश नासती ॥

।। इति श्रीरामदासक्रुत संकटनिवारसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं ॥

Saturday, March 19, 2011

होलिकापूजन:-

फाल्गून शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस होलाष्टक साजरे केले जाते. त्यासोबतच होळी उत्सव साजरा करण्याची सुरूवात होते. होळीची तयारी देखील तेव्हापासूनच सुरू होते. होळी दहन आणि पूजा यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्या.
* होळीला कोणत्याही झाडाची लाकडे (फांद्या) कापून त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात.
* प्रत्येक जम झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, तेव्हा तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. * नंतर त्या फांदीच्या चहुबाजूने लोक उभे रहातात.
* गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या होळीत रचल्या जातात. त्यालाच होळी म्हणतात.
* त्यानंतर मुहूर्तानुसार होलिका पूजन केले जाते. * वेगवेगळ्या क्षेत्रात आणि समाजात वेगवेगळ्या पध्दतीने पूजा केली जाते. आपल्या पारंपारीक पूजा पध्दतीच्या आधारे पूजा करायला हवी. होळी पूजनावेळी खालील मंत्राचे उच्चारण करायला हवे...
-अहकूटा भयत्रस्तैः कृता त्वं होलि बालिशैः ।अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम्‌ ॥
* पूजनानंतर होळी दहन केले जाते.
* दहनानंतर गव्हाच्या ओंब्या त्यात भाजल्या जातात. हा सण नवीन पिकाच्या आनंदातही साजरा केला जातो.
* होळी दहनानंतर जी राख उरते. तिला भस्म म्हटले जाते. ते शरीरावर लावायला हवे.
* राख लावताना खालील मंत्राचे उच्चारण करावे...
-वंदितासि सुरेन्द्रेण ब्रम्हणा शंकरेण च ।अतस्त्वं पाहि माँ देवी! भूति भूतिप्रदा भव ॥
होळीची गरम राख घरात समृध्दी आणते असे मानले जाते. असे केल्याने घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते.

Saturday, October 16, 2010

सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा:-

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो..... रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋ‍षीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला.गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते. गुरूने उत्तर दिले:- ''कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय.'' परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, ''मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाडूनच आणून दे.'' ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या धीरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दु:ख झाले. रघुराजाने आपल्या द्वारी आलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली.परंतु त्याने फक्त 14 कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्यसास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढिग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.

शमीची पाने:- दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्‍तीच्या बळावर जिवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जातांना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्‍या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्‍त मारक शक्‍ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. या वेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरवली, तरी त्यांनी या शस्त्रांच्या माध्यमातून मारक शक्‍ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या साहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्त्वाचे कार्य केले. दसर्‍याच्या दिवशी श्रीरामाचे तारक, तर हनुमानाचे मारक तत्त्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते ते तत्त्व आकृष्ट करून घेऊन ते वायूमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

आपट्याची पाने:- ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा.

Wednesday, September 22, 2010

॥श्रीगणपत्यथर्वशीर्षम्॥

हरिः ॐ नमस्ते गणपतये॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि॥ त्वमेव केवलं कर्तासि॥
त्वमेव केवलं धर्तासि॥ त्वमेव केवलं हर्तासि॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि॥
त्वं साक्षादात्मासि नित्यं ॥ १॥ऋतं वच्मि॥ सत्यं वच्मि॥ २॥अव त्वं माम्॥
अव वक्तारम्॥ अव श्रोतारम्॥ अव दातारम्॥ अव धातारम्॥ अवानूचानमव शिष्यम्॥
अव पश्चात्तात्॥ अव पुरस्तात्॥ अवोत्तरात्तात्॥ अव दक्षिणात्तात्॥ अव चोर्ध्वात्तात्॥
अवाधरात्तात्॥ सर्वतो मां पाहि पाहि समंतात्॥ ३॥त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः॥
त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः॥ त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि॥ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि॥
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥ ४॥सर्वं जगदिदं त्वत्तो जायते॥ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति॥
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति॥ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति॥ त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः॥
त्वं चत्वारि वाक्पदानि।।५॥त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः॥
त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारास्थितोऽसि नित्यम्॥ त्वं शक्तित्रयात्मकः॥
त्वां योगिनोध्यायंति नित्यम्॥त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वंमिंद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्॥ ६॥गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम्॥
अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धं॥ एतत्तव मनुस्वरूपम्॥ गकारः पूर्वरूपम्॥
अकारो मध्यमरूपम्॥ अनुस्वारश्चांत्यरूपम्॥ बिन्दुरुत्तररूपम्॥ नादः संधानम्॥संहिता संधिः॥
सैषा गणेशविद्या॥ गणक ऋषिः॥ निचृद्गागायत्रीच्छंदः॥गणपतिर्देवता॥ ॐ गं गणपतये नमः॥ ७॥
एकदंताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि॥ तन्नो दंतिः प्रचोदयात्॥ ८॥एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणाम॥ रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्॥रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्॥ रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्॥ भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्॥आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्॥ एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः॥ ९॥नमोत्रातपतये। नमो गणपतये। नमः प्रमथपतये। नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय विघ्नानाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः॥१०॥
एतदथर्वशीर्षं योऽधीते॥ स ब्रह्मभूयाय कल्पते॥ स सर्वविघ्नैर्नबाध्यते॥ स सर्वत: सुखमेधते ।
स पंचमहापापात्प्रमुच्यते॥ सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति॥ प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति॥ सायं प्रातः प्रयुंजानो अपापो या भवति॥सर्वत्राधीनोऽपविघ्नो भवति॥ धर्मार्थकाममोक्षं च विंदति॥ इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं ॥ यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति। सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्॥ । अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति॥ चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति। इत्यथर्वणवाक्यम्॥ ब्रह्मद्यावरणं विद्यात् । न बिभेति कदाचनेति॥
यो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति॥ यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति॥
यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति॥यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते॥ अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति॥ सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति॥ महाविघ्नात्प्रमुच्यते॥ महादोषात्प्रमुच्यते॥ महापापात् प्रमुच्यते॥ स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति॥
य एवं वेद इत्युपनिषत्॥ १४॥ॐ सहनाववतु॥ सहनौभुनक्तु॥ सह वीर्यं करवावहै॥
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥ॐ शांति॒: । शांति॒:॥ शांति॑:॥ ॥
इति श्रीगणपत्यथर्वशीर्षं समाप्तम्॥

Tuesday, March 16, 2010

गुढी पाडवा:-

आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो। या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी। नंतर पूजा-अर्चा करून गुढी उभारावी, असे सांगितले आहे. तसेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करावे. गुरूं, वडीलधार्‍यांना वंदन करावे, असेही सांगितले आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असले त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे मंगळवारी सुरु होत असल्यामुळे मंगळ हा या वर्षाचा अधिपती असे समजले पाहिजे. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने काही विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.
जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात। अशी विविध प्रकारांनी संवत्सरांची विभागणी आणि मांडणी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे.
-------ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

Friday, February 19, 2010

जाणता राजा:-

शिवकालीन प्रशासकीय व्यवस्थेत शिवाजी महाराजांची शिस्त खूपच करडी होती। सरकारी नोकरी वंशपरंपरेने न देता लायक व्यक्तिस द्यावी आणि सरकारी कामकाजात लष्कराचा हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी फर्मान काढले होते. निरनिराळ्या खात्यांवर स्वतंत्र प्रधान नेमून त्यांच्याकडून त्या त्या खात्याची कामे करुन घेतली जात असत. रयतेकडून जमीनदारांमार्फत करवसुली न करता सरकारी नोकरांकडून करावी. राज्याचा खर्च भागवून नियमितपणे शिल्लक ठेवावी, असे स्थायी निर्देश त्यांनी दिलेले असायचे. सैन्य भरतीत महाराज स्वत:च लक्ष घालीत असत. प्रत्येक सैनिकाला सर्वप्रकारची हत्यारे हाताळण्याचे व चढाईचे प्रशिक्षण देण्याबाबत ते दक्षता घेत असत. महाराजांच्या फौजेत पराक्रमी सैनिक व सेनानींना खास बक्षिसे व उच्च पदे, पदव्या बहाल करुन त्यांचा गौरव केला जात असे. छत्रपती हे केवळ उत्तम राज्यकर्तेच नव्हे तर कुशल प्रशासक होते.
वीरपुरुषांची मोर्चेबांधणी:-
महाराजांच्या लष्करात अतिशूर लढवय्ये, एकनिष्ठ आणि कुशल सैनिकांचा समावेश असे. घोडदळ व पायदळ हे त्यांच्या लष्कराचे मुख्य विभाग होते. घोडदळात सुमारे दीड लाख, तर पायदळात सुमारे दोन लाख सैनिक होते. सैनिकांमध्ये सेनापती, हजारी, जुमेलदार, हवालदार, नाईक अशी पदे असत. साधेपणा व शिस्त ही महाराजांच्या लष्कराची महत्त्वाची वैशिष्टये होती. राज्याची मदार किल्ल्यांवर होती, हे जाणून महाराजांनी रायगड, पुरंदर, पन्हाळा, सिंहगड, विशालगड, प्रतापगड आदी किल्ले, कोट व जंजिरे उभारुन आपल्या मुलूखांची तटबंदी मजबूत केली. खुद्द महाराज हे किल्ले बांधण्याच्या तंत्रात निष्णात स्थापत्यतज्ज्ञ म्हणून ओळखले जात असत. मोगल व आदिलशहा यांच्या सैन्य संख्येचा तुलनेत छत्रपतींकडे सैन्यबळ कमी होते. तथापि, तरुण पिढीतली कर्तबगार पराक्रमी माणसे हेरुन त्यांना महाराजांनी युद्धतंत्रात पारंगत केले. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, दाजी जेधे, रामचंद पंत, शंकराजी नारायण, परशराम पंत, गिरजोजी यादव, बंडो बल्लाळ, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, नेताजी शिंदे आदींच्या समावेश होता. महाराजांचे युद्धनैपुण्य अद्वितीय होते. त्यांनी आदिलशहा, कुतूबशहा, जंजिर्‍याचा सिद्दी, फिरंगी-वखारवाले, अफझलखान, शयस्तेखान, मिर्झा राजा जयसिंग, औरंगजेब या एकापेक्षा एक बलाढ्य शत्रुंशी समर्थपणे मुकाबला करुन त्यांना नामोहरम केले. मराठा तितुका मिळवावा ही मेघगर्जना करुन महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी महाराजांनी आपले सारे आयुष्य वेचले।
युद्धतंत्र-गनिमी कावा:- शिवाजी महाराजांना आपल्या मुलूखांचे तंतोतंत भौगो‍‍‍लिक ज्ञान होते। मोगल, आदिलशहा यांच्या तुलनेत सैन्यबळ व शस्त्रसाठा कमी असल्याने ते गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर करीत असत आणि त्यात त्यांना जबरदस्त यशही आले।शत्रुच्या नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराज वेगवेगळ्या डावपेचांचा वापर करीत असत. शत्रुच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्या कोणत्या सेनाधिकार्‍याला केव्हा व कोठे पाचारण करायचे याबाबतच त्यांचे निर्णय अचूक ठरत असत. गडावर वेळ पडली तर गडावरील सैनिकांनी काय करायचे आणि गडाबाहेर असलेल्यांनी काय करायचे, याचे अचूक प्रशिक्षण सैन्याला तसेच गावकर्‍यांना दिले जात असे. अफझलखानाचा वध, आग्रा भेट, शाहिस्तेखानावर केलेला वार, औरंगजेबच्या कैदेतून शिताफीने केलेली सुटका या ऐतिहासिक घटनांमध्ये शिवबांनी जे यश संपादन केले, त्यात गनिमी काव्याची अहम भूमिका होती. शिवबा हे चतुर व बुद्धिमान योद्धा होते.
नाविकदलाचे निर्माते:- परकीयांच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी सागरी तटालगत किल्यांची गरज ओळखून छत्रपतींनी मालवण बंदरावरील कुरटे बेटावर सिंधुदूर्ग किल्ल्याची उभारणी केली। सिंधुदुर्गसारखा अभेद्य जलदुर्गाची निर्मिती खर्‍या अर्थाने छत्रपतींच्या अगाध स्थापत्य ज्ञानाची प्रचिती देते. भारत देशाला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभल्याने सागरीमार्गे शत्रुंची आक्रमणे होण्याची शक्यता ओळखून महाराजांनी नाविकदलाची निर्मिती केली आणि इब्राहिम दौलतखानची त्या दलाचे प्रमुख पदी नियुक्ती केली. आधुनिक शस्त्रसाठा, युद्धनौका, जहाजे, आगबोटींचे बांधकाम सागरी किनार्‍यावर करुन छत्रपतींनी राज्याच्या संरक्षणासाठी अभेद्य तटबंदी केली. शिवाजीराजे हे नाविकदलाची मुहूर्तमेढ रोवणारे देशातील ‍पहिले राजे होते.

Wednesday, October 14, 2009

धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे:-


कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.

*धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे?
भगवान धनवंतरीची पूजा करा.
घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करा.
सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.
मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा.
तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करा.
कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावा.

*धनत्रयोदशी पूजेत काय करावे.
अ)कुबेर पूजन
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवा. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाका.
संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करा.
कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्र म्हणा.
''श्रेष्ठ विमानावर विराजमान, गरूडाप्रमाणे भासणारा, दोन्ही हातात गदा धारण करणारा, डोक्यावर श्रेष्ठ मुकुट करणार्‍या, भगवान शंकराचा प्रिय मित्र निधीश्वर कुबेर मी तुझे ध्यान करतो आहे.''

*खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा.
'यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये
धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।'

नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करा.

ब) यम दीपदान
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा.
गंध, पुष्‍प आणि अक्षतांनी पूजा करा आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा.

'मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।'

आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते.

यमराज पूजन
या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा.
घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावा. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करा.

Monday, September 21, 2009

शारदीय-नवरात्रौत्सव:-



*देवीसूक्तम:-
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥१॥

रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः ।
ज्योत्स्ना यै चेन्दुरुपिण्यै सुखायै सततं नमः ॥२॥

कल्याण्यै प्रणतां वृध्दै सिध्दयै कुर्मो नमो नमः ।
नैऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः ॥३॥

दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ।
ख्यातै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥४॥

अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः ।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः ॥५॥

या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शाध्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥६॥

या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥७॥

या देवी सर्वभूतेषु बुध्दिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥८॥

या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥९॥

या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१०॥

या देवी सर्वभूतेषु छायारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥११॥

या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१२॥

या देवी सर्वभूतेषु तृष्णारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१३॥

या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१४॥

Sunday, August 23, 2009

कहाणी ऋषिपंचमीची:-

ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई.

एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरींचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाक लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं, तो सैंपाक टाकून दिला, पुन्हा सैंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्टं देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडू लागली.

बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दु:खी झाला.

दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.

तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषिपंचमीचं व्रत कर! ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुधंतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्षं करावं शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिलं.

त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.

Thursday, August 13, 2009

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली:-


*देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

*राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

*ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

*संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

*राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

*संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

*राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

*ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.

*ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

*केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

Tuesday, August 4, 2009

नारळी पौर्णिमा:-

समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. याद‍िवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात.

श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्‍यालगत राहणार्‍या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

रक्षाबंधनाचे महत्त्व:-

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र सण एकाच दिवशी साजरे करण्यात येतात. प्राचीन व महाभारतकालीन ग्रंथातही या सणाचा संदर्भ सापडतो. देव व असुर यांच्यातील संघर्षात देवांचा जय झाल्यानंतर या सणास सुरूवात झाल्याचेही मानण्यात येते. दंतकथेनुसार देव व असुर यांच्यातील युद्धात देवांची पीछेहाट होत असलेली बघून देवराज इंद्र यांनी युद्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला. इंद्राची पत्नी इंद्राणीने त्याच्या हातात रक्षाबंधन केले. यामुळे त्यांना युद्धात विजय प्राप्त झाला. पुराणांनुसार श्रावण पौर्णिमेस पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद पवित्र मानले जातात.

या सणांस धर्मबंधनाचे स्वरूपही आहे. मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरूवात झाली. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा म्हणून प्रचलित असलेल्या ह्या सणाच्या दिवशी पर्जन्यदेवता वरूण राजाची आराधना करण्यात येते.

या पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते. भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस दागिने, कपडे यासारख्या भेटवस्तू देतात. रक्षाबंधनास सलोनो नावानेही ओळखले जाते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा तळ्यात स्नान करून सूर्यदेवास अर्घ्यदान करण्यात येते. गावानजीक नदी नसल्यास विहिरींवरही ही पूजा केली जाते. ब्राह्मण या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन जानवे धारण करतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेस श्रावण नक्षत्र असल्यास त्यास अनुकूल व लाभदायक मानण्यात येते.

आश्विनीपासून रेवतीपर्यंत 27 नक्षत्रात श्रावण नक्षत्राचा क्रम बावीसावा आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. श्रावण महिन्यातील अंतिम तिथीस येणार्‍या श्रवण नक्ष‍त्राच्या पौर्णिमेस म्हणूनच श्रावणी म्हणण्यात येते. या दिवशीच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतो.

श्रावण आणि रक्षाबंधन;-
'श्रवण' नक्षत्रात बांधला जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहे. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण मासचे नामकरण 'श्रवण' नक्षत्रावरून झाले आहे. तर श्रवण नक्षत्राचे नामकरण मातृ-पितृ भक्त श्रावणकुमारच्या नावावरून झाले आहे. श्रवण नक्षत्रात तीन तारे असतात. ते तीन चरणांची (विष्णूची वामनावतारातील तीन पद) प्रतीके आहेत. याचप्रमाणे अभिजीत नक्षत्र दशरथ राजा यांचे प्रतीक आहे.

उत्तरा भाद्रपद नक्षत्र स्त्री-पुरुषांची जोडी असून श्रावणकुमारचे आई-वडील आहेत. उत्तराषाढ नक्षत्र हे दशरथ राजाचे व्यासपीठ असून पूर्वाभाद्रपदावर श्रावणकुमार आपल्या आई-वडीलांसोबत स्थानबध्द झाले आहेत.

श्रावण महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असतो. कर्क राशी ही जलचर राशी आहे. दशरथ राजाने श्रावणी पौर्णिमेला आपल्या पापाचे प्रायश्चित घेतले होते. त्याचप्रकारे पृथ्वीवरील लोक श्रावण मासात अधिक कर्मकांड करताना दिसतात. श्रावण मास अध्ययन व अध्यापनासाठी श्रेष्ठ मानला जातो. 28 नक्षत्रांमध्ये श्रावणाने विशेष महत्त्व प्राप्त केले आहे. श्रावण नक्षत्रात ज्यांचा जन्म होतो, ते स्वभावाने पराक्रमी, स्वाभिमानी, सहनशील, स्पष्टवादी व सेवाभावी असतात. तसेच ते चांगली प्रगती साधतात. परंतु शत्रूच्या भी‍ती पोटी चांगले कार्य अर्ध्यातून सोडून देत असतात.

रक्षासूत्र व श्रवण नक्षत्र यांचाही संबंध आहे. मोहरी, केशर, चंदन, अक्षदा, दूर्वा, सूवर्ण आदी कापडात बांधून ते पुरुषांच्या उजव्या व महिलांच्या डाव्या हातावर बांधून रक्षाबंधन पूर्वी केले जात होते. मात्र काळानुरूप परंपरेत परिवर्तन घडून आल्याने रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा उत्सव झाला आहे. या दिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करते मात्र त्यासोबत त्याच्यावर असलेल्या कर्तव्यांची जाणीव ही करून देत असते.

Sunday, August 2, 2009

कहाणी श्रावण महिन्यातील:-

*कहाणी सोमवारची फसकीची:-
ऐका महादेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, त्यांत गरीब सवा‍शीण बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणमास आला, म्हणजे काय करावं? दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्याव. एक उपडा दुसरा उताणा पसाभार तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावं पूजा करावी, नंतर प्रार्थनेच्या वेळी 'जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी,' असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं.
असं चारी सोमवारी तिनं केलं. शठकर तिला प्रसन्न झाला. दिवसोंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठविला. आणि आपल्या व्रताची समाप्ति केली. शंकरांनी तिला निरोप पाठविला- अजून तुल नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Tuesday, July 28, 2009

श्रावणी सोमवारचे व्रत:-



श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताचा विधी सर्व व्रतांत सारखाच असतो. हे व्रत श्रावण महिन्यात सुरू करणे शुभ मानले जाते.

श्रावणी सोमवारचे व्रत सूर्यादयापासून प्रारंभ करून तिसर्‍या प्रहरापर्यंत केले जाते. शंकराच्या पूजेनंतर सोमवार व्रताची कथा ऐकणे गरजेचे आहे. हे व्रत करणार्‍याने दिवसातून एकदाच जेवायला हवे.

श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे.
गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे.
घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती वा चित्र ठेवावे.

पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा:-

'मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'

त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करा:-
'ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌॥

ध्यानानंतर 'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐका.
त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.
मग भोजन वा फलाहार घ्या.

श्रावणी सोमवार व्रताचे फळ:-
सोमवारचे हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात.

मंगळागौरीचे व्रत:-

श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.

असे करतात मंगळागौरीचे व्रत:-
आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते.

ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते.

पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे.

जागरणाची धमाल:-
फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.

जिवत्या : नागनरसोबा:-



*श्रावण महिन्यांत सुवासिनी स्त्रिया जिवतीची पूजा दर शुक्रवारी करतात. छार्पाल नागनरसोबाची चित्रे मिळतात.
त्यांची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा व चार शनिवारी नरसोबाची पूजा,
चारी बुधवारी बुधाची पूजा व गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात.

*प्रत्येक पूजेच्या वेळी कापसाची गजमाळ व आघाडा, दूर्वा यांची माळ वाहतात. दर शुक्रवारी जिवत्यांची पूजा, पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवास आमंत्रण देऊन दूध-साखर व फुटाणे देतात. मुलाबाळांच्या सुखरूपतेसाठी जिवतीची पूजा करण्याची पद्धत आहे.

कहाणी नागपंचमीची:-
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.

शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!

एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.

नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Wednesday, April 22, 2009

मनाचे श्लोक:-

|| जय जय रघुवीर समर्थ ||
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढें वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥
मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो । मना अंतरी सार विचार राहो ॥ ४ ॥
मना पापसंकल्प सोडूनी द्यावा । मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व छी छी ॥ ५ ॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे । न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी । सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे । विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारे मना तूची शोधूनी पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥
मना मानसी दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ १२ ॥
मना सांग पां राखणा काय झालें । अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी । बळे लागला काळ हा पाठीलागी ॥ १३ ॥
जीवा कर्मयोगे जनीं जन्म झाला । परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेची गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५ ॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥
मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते । अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे । मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥
मना राघवेवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे । मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥
बहू हिंपुटी होईजे मायपोटी । नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी । अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥
मना वासना चूकवी येरझारा । मना कामना सोडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी । मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥
मना सज्जना हीत माझे करावे । रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा । जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥
न बाले मना राघवेवीण काही । मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो । देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥
रघूनायकावीण वाया शिणावे । जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे । अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥
मना वीट मानू नको बोलण्याचा । पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे । पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥
देहेरक्षणाकारणे यत्न केला । परी शेवटी काळ घेऊन गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची । पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥
भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
घूनायकासारिखा स्वामि शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥
दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे । बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥
महासंकटी सोडिले देव जेणे । प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥
अहल्या शिळा राघवे मुक्त केली । पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥
उपेक्षी कदा रामरूपी असेना । जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥
असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥
सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥
मना प्रार्थना तूजला एक आहे । रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
विकिकरणअवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । जयाचेनि योगे समाधान बाणे ॥
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥
मना पाविजे सर्वही सूख जेथे । अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥
विविके कुडी कल्पना पालटीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥
बहू हिंडता सौख्य होणार नाही । शिणावे परी नातुडे हीत काही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥
बहुतांपरी हेचि आता धरावे । रघूनायका आपुलेसे करावे ॥
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥
मना सज्जना एक जीवी धरावे । जनीं आपुले हीत तुवां करावे ॥
रघूनायकावीण बोलो नको हो । सदा मानसी तो निजघ्यास राहो ॥ ४३ ॥
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी । कथा आदरे राघवाची करावी ॥
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे । सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥
जयाचेनि संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येउनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥
मना जे घडी राघवेवीण गेली । जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे । जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥
मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे । जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा । सदा रामनामे वदे सत्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥
सदा बोलण्यासारिखे चालताहे । अनेकी सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥
नसे अंतरी काम नानाविकारी । उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥
मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी । प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे । न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी । सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥
नसे मानसी नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥
जगी होइजे धन्य या रामनामे । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥
नको वासना वीषयी वृत्तिरूपे । पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा । मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनी कामना राम नही जयाला । अती आदरे प्रीति नाहि तयाला ॥ ५९ ॥
मना राम कल्पतरू कालधेनू । निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता । तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥
उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥
जनीं सज्जनीं वाद हा वाढवा । पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥
निजध्यास तो सर्व तूटोनी गेला । बळे अंतरी शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदे बुडाला । मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥
घरी कामधेनू पुढे ताक मागे । हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे । तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥
अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना । अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे । अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥
धरी रे मना आदरे प्रीति रामी । नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥
नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे । करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥
घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥
बळे आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥
सुखानंदकारी निवारी भयाते । जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥
सदा रामनामे वदा पूर्णकामे । कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥
जयाचेनि नामे महादोष जाती । जयाचेनि नामे गती पाविजेती ॥
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥
न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥
देहेदंडणेचे महादुःख आहे । महादुःख ते नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥
बहुतांपरी संकटे साधनांची । व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥
समस्तांमधे सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधूत पाहे ॥
जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥

Thursday, April 9, 2009

बजरंगबली की जय:-



हनुमानापासून काय शिकायचे तर त्याचा विनम्रपणा. शक्तीशाली असूनही विमन्रता त्याच्यात होती. म्हणूनच तो अत्युच्चपदाला पोहोचला. केवळ भुजात बळ आहे, म्हणून दादागिरी करणार्‍या आजच्या 'बलभीमांनी' हनुमंताकडून ही गोष्ट आवर्जून शिकली पाहिजे. एखादी बलवान व्यक्ती कुणापुढे झुकत असेल तर तो नक्कीच विनम्रपणा समजावा. बुध्दी व बळ यांचा संयोग त्याच्या ठिकाणी असतो, हे लक्षात घ्यावे.

श्रीराम व सुग्रीव यांचे कोणतेच काम हनुमानाशिवाय पूर्ण होत नव्हते. हनुमान दोन्ही हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहत असत. रावणाने हनुमानाच्या नम्रतेला लाथाडून त्याच्याशी चार हात करण्याची हिंमत दाखवली आणि त्याला आपली सोन्याची लंका जळालेली बघावी लागली.

बुद्धी व शक्ती यांच्या मीलनापुढे कुणाचेही काहीही चालत नाही. भारतीय संस्कृतीत दोन महावीर मानले जातात. ते म्हणजे हनुमान व वर्धमान. एक परम भक्त तर दूसरे अहिंसेचे पुजारी. अहिंसकतेशिवाय भक्ती अशक्य आहे. 'जय हनुमान' म्हटल्यानेही संकट, भीती दूर झाल्यासारखे वाटते.

अंजनी पुत्र : सुमेरु पर्वताचे राजा केसरी हे हनुमानाचे पिता होते. अंजना ही माता असल्याने हनुमानाला अंजनी पुत्र म्हटले जाते.

पवन पुत्र : हनुमानाला पवनपुत्रही म्हटले जाते. वायुला मारूत म्हटले जाते. मरूत म्हणजे वायु. त्यावरून हनुमानाला मारूती असे म्हटले जाते. पवनाच्या वेगासमान हनुमानामध्ये उडण्याची शक्ती असल्याने पवनपुत्र असेही म्हणतात.

हनुमान : इंद्रदेवाच्या वज्रप्रहाराने हनुमानाची हनुवटीला जबर मार लागला होता. तेव्हापासून पवनपुत्राचे नाव हनुमान म्हणून प्रचलित झाले होते.

बजरंगबली : वज्राला धारण करणारे व वज्रासारखे टणक अर्थात बलवान शरीर असलेल्या हनुमानाला बजरंगबली (बजरंगबली) असे म्हटले जाऊ लागले.

श्रीमारुतिस्तोत्र:-
भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुति
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥
महाबळी प्राणदाता, सकंळा उठवी बळें ।
सोख्यकारी दःखहारी, दुत वैश्ण्वगायका ॥
दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता, भव्यसिंदुरलेपन ॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा, पुरातना ।
पुण्यवंता,पुण्यशीला, पावना परितोशका ॥
ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोट्ला पुढे ।
काळाग्नी , काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥
ब्रम्हांडे माइली नेणों, आंवळें दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भुरकुटी,ताठिल्या- बळें ॥
पुछ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंड्लें बरीं ।
सुवर्णकटिकासोटी,घंटा किंकिणि नागरा ॥
ठकारे पर्वताऐसा, नेट्का सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठे, महाविध्युल्लतेपरी ॥
कोटिच्या कोटि उड्डाणें, ज़्हेपावें उत्तरेकडे ॥
मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधें उत्पाटिला बळे ॥
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगतीं ।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥
अणुपासोनी ब्र्म्हांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमांदार धाकुटे ॥
ब्र्म्हांडाभोंवतें वेढे, वज्रपुछए करुं शके ।
तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडीं पाहतां नसे ॥
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सुर्यमंड्ळा।
वाढ्ता वाढता वाढे, भेदिलें शुन्यमंडळा ॥
धनधान्य्पशुवृध्दि, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती परुपविद्यादि, स्तोत्रपाठें करुऐयां ॥
भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तहि ।
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ।
हे ध्ररा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ॥
दृढदेहो निसंदेहो सैख्या च्न्द्रकळागुणें ॥
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू ।
रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोश नासती ॥
।। इति श्रीरामदासक्रुत संकटनिवारसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं ॥

Friday, March 27, 2009

शालिवाहन शक म्हणजे काय?

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मात्र, आपल्याला फारशी माहिती नसते.

शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.

याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.

शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.

शक संवत- शंक संवताचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.

विक्रम संवत- भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याच्या शास्त्रीय विधी या आहेत ज्या शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाची स्मृतीत आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याची संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते.

Tuesday, March 24, 2009

गुढीपाडव्याचा गुढार्थ :-

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवाहन शक नावाच्या कुंभार समाजाच्या मुलाने याच दिवशी मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपडले आणि त्यांना सजीव बनविले. त्यांच्या मदतीने शत्रूंचा सामना केला. या विजयाच्या प्रित्यर्थ शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला.

शालिवाहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे. त्यावेळी लोक चैतन्यहीन, पौरूषहीन आणि पराक्रमहीन बनले होते. त्यामुळे शत्रूसमोर त्यांचा टिकाव लागत नव्हता. मातीपासून निर्मित सैन्य विजयश्री कसे मिळवून देऊ शकते? पण शालिवाहनने त्या चैतन्यहीन लोकांमध्येही चैतन्यांचा संचार केला. पौरूष्य आणि पराक्रम जागविला आणि शत्रू पराजीत झाला.

आजच्या झोपलेल्या चैतन्यहीन समाजाला जागे करण्यासाठीही अशा शालिवाहनांची आवश्यकता आहे. मानवात ईश्वरीशक्ती आहेच. पण आवश्यकता आहे ती त्याला जागविण्याची. आजच्या दिवशी पुरूषार्थ गाजविणारा आणि पराक्रमी सांस्कृतिक वीरांचा समाज तयार करण्यासाठी सुरवात व्हायला हवी.

याच दिवशी श्री रामचंद्रांनी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघरी उत्सव साजरा करीत गुढ्या उभारल्या होत्या. महाराष्ट्रात आजही घराच्या अंगणात गुढ्या उभारण्याची प्रथा प्रचलित आहे. त्यामुळेच या दिवसाला 'गुढीपाडवा' हे नाव मिळाले. घराच्या अंगणात उभारण्यात येणारी ही गुढी विजयाचा संदेश देते. गुढी म्हणजे विजयी पताका. भोगावर योगाचा विजय. विकासावर विचारांचा विजय. मंगलमय आणि पवित्र वातावरणात सतत प्रसारीत करणारी ही गुढी उभारणार्‍याला आत्मनिरिक्षण करून बघावयास हवे की माझे मन शांत, स्थिर आणि सात्विक बनले आहे की नाही?

मलबारमध्ये हा उत्सव विशिष्ट पध्दतीने साजरा केला जातो. घराच्या देवगृहात घरातील सर्व संपत्ती शोभेच्या वस्तू व्यवस्थित मांडून ठेवतात. या दिवशी सकाळी लवकर उठून डोळे उघडल्याबरोबर गृहलक्ष्मीसोबत प्रभूचे दर्शन घेतात. घरातील मुख्य व्यक्ती संपत्ती आणि ऐश्वर्य याने सुशोभित होऊन देवाची आरती करतात. मलबारमधील या प्रथेमागे भारतीय संस्कृतीची झलक दिसते. रोज सकाळी-सकाळी शुभ दर्शन करणार्‍याचा पूर्ण दिवस चांगला जातो असे आपम मानतो. मग वर्षारंभाच्याच दिवशी प्रभूचे दर्शन करणार्‍याचे वर्ष चांगलेच जाईल. यात आश्चर्य ते काय?

या दिवशी कडूलिंबाची पाने चावून खाल्ली जातात. मंदिरात दर्शन करणार्‍याला कडूलिंब आणि साखर प्रसादाच्या रूपात मिळते. कडूलिंब कडू असतो. पण आरोग्यासाठी लाभदायी असतो. त्याचे सेवन करणारा नेहमी निरोगी राहतो. काही विचार कितीही त्रासदायी असले तरी जीवनाला उदात्त बनवितात. अशात सुंदर, सात्विक विचारांचे सेवन करणार्‍यास मानसिक आणि बौध्दिक आरोग्य मिळते. त्याचे जीवन निरोगी बनते. प्रगतीच्या रस्त्यावर चालणार्‍याला जीवनात कितीदा तरी 'कडू घोट' प्यावे लागतात हे देखील यात दिसते.

मंदिरात मिळणार्‍या साखर आणि लिंबाच्या पानाच्या प्रसादामागे मधूर भावना असते. जीवनात सुख, दु:ख कधीच एकटे येत नाही. सुखामागे दु:ख आणि दु:खामागे सुख दडलेले असते. थोडक्यात हा उत्सव चैतन्यहीन मानवात चेतना भरून त्याच्या अस्मितेला जागृत करतो.

रामनवमी व्रत कसे करावे?

चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते.या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता.
भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.

रामनवमी व्रत कसे करावे?
* व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.
* दुसर्‍या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.
* त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.
* 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव|
तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||'या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.
* त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये'
हा संकल्प करून काम- क्रोध- लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.
* मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.
* घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
* कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.
* त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.

रामनवमीच्या दिवशी काय करावे?
* या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.
* दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.
* तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे.
* या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा.
* प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.
* दुसर्‍या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.
* गरीब आणि ब्राम्हणांना दान करून त्यांना जेवू घालावे.

रामनवमी व्रताचे फळ:-
* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्‍यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.

रामरक्षास्तोत्र:-
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता। अनुष्टुप्‌ छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान्‌ कीलकम्‌ । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ।
अथ ध्यानम्‌:
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ । वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकार दीप्तं दधतमुरुजटामंडलं रामचंद्रम ।

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥1॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥2॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरांतकम्‌ ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥3॥
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न दृष्टुमति शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥
वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥14॥
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्‌ ।
अभिरामस्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥
तरुणौ रूप सम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥
शरण्यौ सर्र्र्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्‌ ॥20॥
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथान्नश्च रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥22॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥
रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्‌ ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ ।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥26॥
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥
श्रीराम राम रघुनन्दनराम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचंसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥
माता रामो मत्पिता रामचन्द्रः
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयलुर्नान्यं
जाने नैव जाने न जाने ॥30॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम्‌ ॥31॥
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥34॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌ ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥35॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्‌ ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्‌ ॥36॥
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥

Sunday, February 15, 2009

शिवकल्याण राजा:-



निश्चयाचा महामेरु....
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.

जय जय शिवराया:-
प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया.

शिवरायांचा पाळणा:-
गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||

हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||

चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||
ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान

हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||