I made this widget at MyFlashFetish.com.

Wednesday, April 22, 2009

मनाचे श्लोक:-

|| जय जय रघुवीर समर्थ ||
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढें वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥
मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो । मना अंतरी सार विचार राहो ॥ ४ ॥
मना पापसंकल्प सोडूनी द्यावा । मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व छी छी ॥ ५ ॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे । न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी । सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे । विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारे मना तूची शोधूनी पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥
मना मानसी दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ १२ ॥
मना सांग पां राखणा काय झालें । अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी । बळे लागला काळ हा पाठीलागी ॥ १३ ॥
जीवा कर्मयोगे जनीं जन्म झाला । परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेची गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५ ॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥
मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते । अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे । मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥
मना राघवेवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे । मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥
बहू हिंपुटी होईजे मायपोटी । नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी । अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥
मना वासना चूकवी येरझारा । मना कामना सोडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी । मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥
मना सज्जना हीत माझे करावे । रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा । जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥
न बाले मना राघवेवीण काही । मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो । देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥
रघूनायकावीण वाया शिणावे । जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे । अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥
मना वीट मानू नको बोलण्याचा । पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे । पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥
देहेरक्षणाकारणे यत्न केला । परी शेवटी काळ घेऊन गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची । पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥
भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
घूनायकासारिखा स्वामि शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥
दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे । बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥
महासंकटी सोडिले देव जेणे । प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥
अहल्या शिळा राघवे मुक्त केली । पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥
उपेक्षी कदा रामरूपी असेना । जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥
असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥
सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥
मना प्रार्थना तूजला एक आहे । रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
विकिकरणअवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । जयाचेनि योगे समाधान बाणे ॥
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥
मना पाविजे सर्वही सूख जेथे । अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥
विविके कुडी कल्पना पालटीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥
बहू हिंडता सौख्य होणार नाही । शिणावे परी नातुडे हीत काही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥
बहुतांपरी हेचि आता धरावे । रघूनायका आपुलेसे करावे ॥
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥
मना सज्जना एक जीवी धरावे । जनीं आपुले हीत तुवां करावे ॥
रघूनायकावीण बोलो नको हो । सदा मानसी तो निजघ्यास राहो ॥ ४३ ॥
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी । कथा आदरे राघवाची करावी ॥
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे । सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥
जयाचेनि संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येउनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥
मना जे घडी राघवेवीण गेली । जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे । जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥
मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे । जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा । सदा रामनामे वदे सत्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥
सदा बोलण्यासारिखे चालताहे । अनेकी सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥
नसे अंतरी काम नानाविकारी । उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥
मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी । प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे । न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी । सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥
नसे मानसी नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥
जगी होइजे धन्य या रामनामे । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥
नको वासना वीषयी वृत्तिरूपे । पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा । मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनी कामना राम नही जयाला । अती आदरे प्रीति नाहि तयाला ॥ ५९ ॥
मना राम कल्पतरू कालधेनू । निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता । तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥
उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥
जनीं सज्जनीं वाद हा वाढवा । पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥
निजध्यास तो सर्व तूटोनी गेला । बळे अंतरी शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदे बुडाला । मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥
घरी कामधेनू पुढे ताक मागे । हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे । तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥
अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना । अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे । अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥
धरी रे मना आदरे प्रीति रामी । नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥
नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे । करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥
घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥
बळे आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥
सुखानंदकारी निवारी भयाते । जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥
सदा रामनामे वदा पूर्णकामे । कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥
जयाचेनि नामे महादोष जाती । जयाचेनि नामे गती पाविजेती ॥
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥
न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥
देहेदंडणेचे महादुःख आहे । महादुःख ते नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥
बहुतांपरी संकटे साधनांची । व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥
समस्तांमधे सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधूत पाहे ॥
जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥